चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आगारामार्फत पूर्ववत बस सेवा सुरू करण्यात आली असून, ती दररोज सकाळी ८ वाजता राजुरा येथून गडचांदूर, कोरपना, कोळशी, वेळाबाई फाटा, मोहदा, नेरड, पुरड मार्गे मुकुटबनकडे रवाना होईल. तसेच सकाळी १० वाजता ही बस पुन्हा राजुराकडे परत येईल.
या मार्गावर अनेक लहान गावांचा समावेश असून, नागरिकांना शासकीय कामासाठी, शिक्षणासाठी, तसेच आरोग्य सेवेसाठी तालुका ठिकाणी दररोज ये-जा करावी लागते. मात्र, बससेवेअभावी विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना व सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या गरजेला ओळखून क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते मुक्तानंद भाऊ भोंगळे, राहूल भाऊ पावडे, धिरज भाऊ भोयर, संदेश भाऊ शंभरकर यांनी आमदार देवरावदादा भोंगळे यांच्याकडे सदर मागणी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार देवरावदादांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर यांना योग्य त्या निर्देशांनी ही सेवा सुरू करण्यास निर्देश दिला.
या पूर्ववत सुरू झालेल्या बस सेवेमुळे राजुरा, कोरपना, झरी, वणी व मारेगाव या पाच तालुक्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, शेकडो लोकांना दररोज सहज प्रवास करता येणार आहे.